All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Friday 24 May 2019

" भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली " (भाग तिसरा )

          कुठेतरी दूरवर , ढगांच्या आड सूर्योदय होतं होता. ढगांमध्ये राहून गेलेल्या मोकळ्या जागेतून सूर्याची किरणे गुपचूप त्या हिरव्या माळरानावर विसावत होती. मधेच गुडूप होऊन जातं, ढग जरा बाजूला सरले कि पुन्हा उजेड. ऊन पावसाचा खेळ नुसता. वाऱ्याने झाडे डोलत होती. जणू काही आनंदाने गाणी गात होती सर्वच. पावसाळा सुरु झालेला ना.. सारेच आनंदात होते. सुप्री ते सर्व , हॉटेलच्या बाल्कनीत उभी राहून पाहत होती. संजना अजूनही झोपलेली होती. काल रात्रीच त्यांचे आगमन झालेलं. रात्री कुठे जाऊन आकाशला शोधणार म्हणून स्टेशन जवळच असलेल्या एका हॉटेल मध्ये मुक्काम केला. सुप्रीला लवकर जाग आली तशी ती बाल्कनीत उभी राहून आजूबाजूचा परिसर न्याहाळत होती. थोडे शांत वाटतं होते. ते शहराच्या गजबजाटातून दूर आले कि अशीच मनःशांती मिळते. तरी मनात बेचैनी होती. कुठे असेल आकाश, आपला मेसेज मिळाला असेल का .... कि या पावसाच्या नादात विसरला आपल्याला... एक ना हजार प्रश्न सुप्रीच्या डोकयात. तरी देखील आकाश जास्त दूर गेला नसेल तर एका दिवसात त्याची भेट होईल , असेच वाटतं होते तिला. 
=====================================================================

पावसाचा प्रवास नुकताच सुरु झालेला असला तरी पूजाच्या ग्रुपचा प्रवास अजूनही सुरु झाला नव्हता. त्यांच्यातला एक सर्दी - खोकला घेऊन बसला होता. त्यामुळे या सर्वांनाच थांबावे लागले होते. पूजा सकाळीच समोरच्या गावात निघून गेली होती. सोबत कादंबरी होतीच.
" काय यार !! ... किती नाजूक आहे तो... कालच पाऊस सुरु झाला आणि लगेच आजारी... दरवर्षी हाच सुरुवात करतो आजाराची.. "  कादंबरी वैतागत म्हणाली.
" chill !! असते काही जणांना अशी सवय. वातावरणात बदल झालेला नाही सहन होतं सर्वाना. तुझ्या सारखे सगळेच स्ट्रॉंग नसतात ना... समजलं ना.. " पूजाने कादंबरीचे नाक ओढले.
" आपण कुठे जातो आहोत नक्की.... कधी सांगणार आहेस.. " कादंबरीने पुन्हा विषय काढला. पूजा थांबली. " आता तर सगळेच तयार आहेत तुझ्यासोबत यायला , तरी सांगत नाहीस... काय खजिना शोधायला जातो आहोत का .... तस असेल तर सगळा खजिना तुलाच ठेव... नाव तर सांग त्या ठिकाणचे... ",
" जातो आहोत ना .... कळेल ..... इतकंच सांगीन , तुला जी शांतता हवी आहे ना, ती आहे तिथे. या सर्व गडबडी पासून दूर. असे ठिकाण आहे ते. " ,
" कधी पोहोचणार तिथे देवाला माहित .... " कादंबरीने मोठा उसासा टाकला. 
=====================================================================

आकाशला त्या देवळातून बाहेर पडावेसे वाटतं नव्हते. तरीही बाहेर आलाच. दुसरा दिवस पावसाचा. आकाशने अंदाज लावला वातावरणाचा. एकंदरीत आज जास्त दूर जाता येणार नाही, असं क्षणिक मनात येऊन गेलं त्याच्या. आकाशने त्याची सॅक पुन्हा पाठीवर घेतली आणि खाली गावात न जाता एका वेगळीच वाट पकडली. समोर असलेल्या शेतातून पलीकडे जाऊ आणि तिथूनच पुढल्या प्रवासाची आखणी करू असे ठरवले त्याने. निघाला शेतातून. अगदी छातीपर्यंत वाढलेली शेतं... त्यात कालच्या पावसाचे पाणी भरलेलं शेतात. चालताना पायाचा- चिखलाचा आवाज नुसता. आकाशला तसं चालताना खूप मज्जा येत होती. काही आठवलं त्याला . जुने दिवस ... जुन्या आठवणी... आई सोबत... कधी कधी पावसात घेऊन जायची आई खेळायला. लहान होतो ना मी ... असा चिखल दिसला कि आवडायचे मला. मग आईलाही ओढत घेऊन जायचो त्या चिखलात. आणि उड्या मारत राहायचो. .... अगदी पाय दुखेपर्यंत.. थकलो कि ' बस्स झालं !! ' एवढं बोलून घरात पळायचो. पण आईच्या साडीवर किती चिखल उडायचा हे कधी लक्षातच आलं नाही. क्षणभर थांबला आकाश. आपण एवढ्या आठवणी का काढतो आहोत. आईचा काय ... घरातल्या कोणाचाच इतका कधी विचार केला नाही आपण. आई सोबतच्या तर किती आठवणी आहेत ... मग आजचा का ... हा प्रवास असा आठवणींचा का होतो आहे. पुढे जाणे शक्य नव्हते आकाशला. भावना दाटून येतं होत्या. त्यातल्या त्यात आकाशच्या मोबाईलचे नेटवर्क पुन्हा आलं. आणि पाठोपाठ १० मेसेज सुप्रीचे... " आहे तिथेच थांब .. मी येते आहे... " हेच मेसेज. हि कुठे येते आहे आता. तिला तर आपण कॉल करायलाच विसरलो. त्यासाठी तर येतं नसावी. लगेच त्याने सुप्रीला कॉल लावला. लागला नाही . काय करावे. विचार करत पुन्हा त्याच देवळात येऊन बसला. 
=====================================================================

सुप्री - संजनाचा प्रवास सुरु झालेला. पुढच्या अर्ध्या तासात दोघींनी त्या फोटोग्राफी कॅम्प मध्ये प्रवेश केला. खात्री पटवून घेतली कि आकाश तिथे गेलाच नाही. आणखी आजूबाजूच्या परिसराची माहिती गोळा करून , एका अंदाजाने दोघी आकाशच्या मागावर निघाल्या. सुप्री चालता चालता आकाशला सारखा फोन लावत होती. पण मोबाईलला नेटवर्क कुठे होते.
" काय वेड-बीड लागलं आहे का तुला... नाही आहे ना रेंज , कॉल लागणार कसा... ठेव तो मोबाईल.. " संजना ओरडली. मोबाईल चुपचाप खिशात ठेवून सुप्री चालू लागली. जास्त दूर नको जाऊस रे आकाश, सुप्री मनात बोलत होती. 

" हे बघ सुप्री... एवढा जास्त विचार करू नकोस.... आकाश जवळ नसणार , तो बऱ्यापैकी लांब गेला असेल. ३ दिवसानंतर आलो आहोत आपण. आता त्याला तू केलेलं मेसेज मिळाले असतील आणि तो थांबला असेल तरच. आणि तो आजच्या आजच भेटेल असंही काही मनात आणू नकोस... कळलं ना .. आपण चालत राहायचे ठरलं आहे ना.. मग तेच करू. तसही ... इतक्या दिवसांनी आपण दोघीच फिरत आहोत. आठवं जरा जुने दिवस. किती मज्जा करायचो ना आपण. तेव्हा टेन्शन नव्हते असे नव्हते, तरी तेव्हा कोणाची पर्वा केली नाही आपण. आणि ..... आता बघ... " संजना बडबड करत चालत होती. सुप्री फक्त ऐकण्याचे काम करत होती. संजना बोलली त्याप्रमाणे तर होते. आकाशची ओळख झाल्यापासून इतका वेळ संजना सोबत नसतो आपण. पहिली तीच लागायची प्रत्येक कामात, प्रत्येक ठिकाणी, कुठे जायचे असेल तर संजना, काही सांगायचे असेल तर संजना, हसायला संजना... आकाश आल्यापासून त्याच्या सोबतच फिरत असतो, त्याच्याशीच मोबाईल वर बोलणे नाहीतर चॅटिंग... संजनाला तर विसरून गेली मी. सुप्री चालता चालता कधी समोर बघी तर कधी संजनाकडे. 
=====================================================================

                 पूजा - कादंबरी गावातून काही खायच्या वस्तू , काही औषध घेऊन आल्या. आजचा दिवस सुद्धा त्याच ठिकाणी. कदाचित उद्याचा दिवसही इथेच काढावा लागेल. असा विचार कादंबरीच्या मनात येऊन गेला. काय करणार, हे असं फिरणं असले कि अशी आजारपणं आलीच सोबतीने. हि अशी पहिलीच वेळ नव्हती. पण पूजाची अशी कोणती स्पेशल जागा आहे , हे जाणून घ्यायची हुरहूर लागलेली कादंबरीला. असो, कादंबरीने तिच्या कामाला सुरुवात केली. पावसाने सकाळपासून नुसता काळोख करून ठेवला होता. कालच तर सुरुवात केलेली त्याने. आज त्यामानाने शांत होता पाऊस. बघता बघता संध्याकाळ झाली. कादंबरीने घड्याळात पाहिलं तर संध्याकाळचे ५ वाजले होते. पूजाला शोधू लागली. कुठे गेली हि मुलगी. काय झालं हिला सध्या... काही कळत नाही. कादंबरी पुन्हा तिला शोधू लागली. 

त्यांच्या तंबूपासुन मागच्या बाजूला एकटीच दूरवर पाहत बसलेली पूजा. कादंबरी हळूच तिच्या शेजारी जाऊन बसली.
" काय बघते आहेस पोरी... " कादंबरीचा प्रश्न. पूजाला माहित होते कि कादंबरी येणार शोधत.
" बघ .... समोर किती छान सूर्यास्त होतो आहे ना ... " कादंबरीनेही पाहिलं. काळ्या ढगांच्या आडून आडून सूर्य देवाचे प्रस्थान होतं होते. छानच होते ते. कादंबरीला बरं वाटलं ते बघून. पुन्हा पूजाकडे वळली.
" पूजा ... काय झालं आहे तुला .. एवढी वर्ष प्रवास करतो आहोत एकत्र आपण... यावेळेस का अशी वेगळी वाटते तू ... "
 
पूजा छान हसली. " त्याची आठवण काढलीस ना तू .. आपण जेव्हा प्रवास सुरु करणार होतो तेव्हा... आणि तेव्हापासूनच सर्व जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. त्यातच रमली. तो म्हणूनच सांगायचा, अश्या आठवणींच्या गर्द रानात गेलो कि हरवून जातो आपण. बघितलंस ना .... आता त्यातून बाहेरच पडता येतं नाही मला... " कादंबरीला काही सुचले नाही बोलायला यावर. 

थोड्यावेळाने बोलली कादंबरी. " ऐक ना पूजा .... आपण आता ५ वर्ष तरी एकत्र आहोत. त्यातले ४ वर्ष मी तुझ्या आई-वडिलांना ओळखते. पहिल्या वर्षी तूच भेट घालून दिली होतीस त्यांची.  त्यानंतर एकदाही घरी गेली नाहीस तू. मला तर तुझे आई-वडील मी त्यांचीच मुलगी आहे असं वागवतात. मग ... तुझ्याशी त्यांचे हे असे नाते तुटक का वाटते. नाही लक्षात येतं मला. म्हणजे ते दोघे इतके छान आहेत. तुझा भाऊही किती फ्रेंडली आहे. तरी तुझं असे .... लांब लांब राहणे ... " पूजा कादंबरीकडे पाहत होती. " मी विचारणार नव्हते , पण माझ्या मनात तर हा प्रश्न कायमच उभा राहतो. माझं घर सोडण्याचे कारण तुला माहित आहे. माझे आई-वडील कोण , हे तर बघितलं हि नाही मी. साहजिकच .. अशी माया तुझ्या घरी लावतात मला , त्यावरून ते वाईट नाही हे नक्की.. " कादंबरीचे बोलणे संपले होते. पूजाने पुन्हा हलकीशी smile दिली. आणि समोर मावळणाऱ्या सूर्याकडे पाहत राहिली. 

खूप वेळाने पूजा बोलू लागली. " मी ना लहान होते. अगदी लहान नाही. पण थोडेफार समजायचे. तेव्हा एकदा आईने सांगितले होते. बाबांना मुलगा पाहिजे होता. तेव्हा इतके जाणवायचे नाही. कारण कामानिमित्त बाबा सारखे बाहेरच असायचे. घरी आले तरी मला कधी लाडाने जवळ घ्यावे असे कधीच वाटायचे नाही त्यांना. जवळ गेले कि राग राग करायचे. काही चांगले काम केले , परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले... कधीच स्तुती नाही. काही कधी विचारायला गेले कि आईला विचार , इतकंच बोलायचे. कामात असताना काही विचारलं तर खेकसायचे अंगावर. इतका राग का करायचे , कळायचे नाही मला. आई बोलायची छान माझ्याशी. शेवटी आईच ना ती. पण तिलाही कधी कधी नको वाटायचे मी. असं वाटायचं कि मी मुलगी म्हणून जन्म घेतला , ती माझीच चुक झाली. इतक्या लहान वयात असे विचार यायचे मनात. मला लिखाणाची खूप आवड, लहानपणापासून.... बऱ्याच लोकांना , शाळेत तर सर्वाना माझे लिखाण आवडायचे. पण घरी .... काहीच नाही. एक दिवस शाळेत आलेल्या पाहुण्यानी माझ्या निबंधाला छान अशी कंमेंट लिहून दिलेली. वडील नुकतेच आलेले कामावरून. मला आनंद झालेला ना... तशीच ती वही घेऊन गेले दाखवायाला. बाबांनी ते न बघताच हातातली वही फेकून दिली... ' कसली भिकारपणाची लक्षण आहेत हि... लेखक व्हायचे आहे का ... त्यापेक्षा अभ्यास कर.. ' म्हणत तणतणत निघून गेले. वाईट वाटलं तेव्हा खूप. काहीच बोलली नाही. तसेच वागायचे ते. शाळेला सुट्टी पडली कि मला एकटीला आजी- आजोबाकडे सोडून दोघेच कुठेतरी फिरायला जायचे. इतकी नकोशी होती त्यांना मी. त्यामुळे आजी-आजोबा जास्त जवळ मला. आता आजोबा नाही राहिले, ते त्यावेळेस त्यांच्या जुन्या गोष्टी सांगायचे. कुठे फिरायचे, कसे फिरायचे .. सर्व सांगायचे. त्यांच्या लहानपणी त्याचा एक मोठा वाडा होता, त्या गावाच्या गोष्टी सांगायचे. छान वाटायचे ते जग. तिथे जास्त रमायचे मी. घरी पुन्हा जावे असे वाटायचे नाही मला. नंतर , जेव्हा मी आठवीत होते. तेव्हा लहान भावाचा जन्म झाला. तेव्हापासून माझ्या बद्दल असलेलं उरलं - सुरलं प्रेम सुद्धा नाहीस झालं. त्यांना वंशाचा दिवा पाहिजे होता, झालं ते. मी तशीही नावडती होती बाबांना. त्यात आईलाही तोच आवडू लागला. मी घरात असून नसल्यासारखे असायचे. त्याचेच लाड सारखे.... मलाही तो प्रिय होता. पण त्याचे बालपण , माझ्या बालपणापेक्षा किती सुंदर , सुखद होते ... याचे वाईट वाटायचे मला." 

" एकदा कॉलेजमध्ये असताना , मला एका प्रोजेक्ट साठी gold medal मिळालेले, महाराष्ट्र शासनाकडून. केवढा सत्कार झालेला माझा. आई-बाबांना बोलावून सुद्धा कोणीच आलं नाही तिथे. बाकीच्या मुलांचे आई-वडील दोन्ही होते, त्याच्या मुलाचे सत्कार बघायला. त्याचे कौतुक करायला , तो आनंद अनुभवायला. मी मात्र एकटीच तिथे. घरी आले. सांगितलं किती छान झाला सोहळा आणि gold medal हि दाखवले. बाबा , पेपर वाचत बसलेले. डोकं वर न करताच , ' छान ' इतकंच बोलले. आईला दाखवायला गेली तर बोलली , ठेवून दे एका बाजूला ... काम झाल्यावर बघीन. वाईट वाटलं. तेव्हा कळलं आपल्याला या घरात आता किंमत राहिली नाही. त्यानंतर हि तेच , जॉबला लागली. कुठे जाते जॉबला तेही कधी विचारलं नाही. माझा प्रत्येक निर्णय चुकीचा वाटायचा त्यांना. त्यात मी काही बोलली कि आवडायचे नाही. कधी आजारी असले तरी न विचारणारे पालक झालेले ते. जॉब वरून रात्री घरी आली कि जेवली का किंवा जेवणार आहेस का ... हे सुद्धा आई विचारायची नाही. चिडचिड होयाची मग माझी. त्यामुळे ऑफिस मधेच बसून राहायची उशिरापर्यंत. घरी कोण होते विचारायला. कधी भाऊ विचारायचा, ताई उशीर झाला का आज.. ते बर वाटायचे मला. त्याला आवडायचे मी, कधी कधी त्यासाठी खाऊ घेऊन जायचे ना घरी. छान जमायचे आमचे. पण नंतर या दोघांनी काय मनात भरवलं त्याच्या माहित नाही. त्यालाही माझा कंटाळा यायचा. जवळ यायचा नाही. एकदा त्याला खाऊ घेऊन गेली , त्याच्या आवडीचा. तर बोलला .... तूच खा .. माझे पप्पा आहेत , ते आणतील मला खाऊ... तेव्हा शेवटचं वाईट वाटलं स्वतःबद्दल. एवढयाशा लहान मुलालाही मी नको असेन तर ... एखाद्या paying guest सारखी राहायचे घरात मी. फक्त घरातले माझ्याकडून राहण्याचे पैसे घेयाचे नाहीत हाच काय तो फरक. " पूजा सांगता सांगता भावुक झाली.

कादंबरीने तिच्या खांद्यावर हात ठेवला. पूजा पुढे सांगू लागली. " एक दिवस काय झालं, बाबा अगदी शुल्लक कारणावरून चिडले माझ्यावर. त्यात मधेच भावाचा विषय निघाला. तो किती चांगला आहे , मी कशी नको आहे ... का कस माहित नाही ते .. पण त्यांचा माझ्यावरचा राग बाहेर आला. त्या बोलण्यातून , मी त्यांना किती नको आहे , ते सांगून टाकलं त्यांनी. आईने माझ्या बाजूने काहीतरी बोलवं अशी अपेक्षा होती. तीही काहीच बोलली नाही. मी कोणासाठी बोलू आणि काय बोलू , माझ्याकडे विषयच राहिला नाही. त्यादिवसापासून एक विचित्र अबोला सुरु झाला घरात. आई-बाबा-भाऊ आणि बाजूला मी वेगळी. ते तिघेच बोलायचे एकमेकांशी. माझ्याकडे साधं बघायचे हि नाहीत. हे असं घरातच सुरु झाल्यावर काय असणार मनःस्तिथी. त्याचा सर्व परिणाम कामावर झाला. ऑफिसमध्ये लहान लहान चुका. बॉसला सुद्धा आवडायचे नाही. एक - दोनदा ठीक आहे. समजून घेतलं सर्वानी. पण नेहमीच त्याच त्या चुका ... कोण खपवून घेणार. म्हणजे तेव्हा काहीच बरोबर होतं नव्हते . मग विचार आला मनात, का राहत आहोत इथे आपण. उत्तर मिळालंच नाही. आणि नंतर त्या प्रश्नाचा खोलवर विचार केला तेव्हा कळलं कि आता इथे तरी थांबावे असे काहीच राहिले नाही. किंवा अडवणारे कोणी नाही. कोणासाठी उगीच अडचण बनण्यापेक्षा तिथून निघालेलं बरे , हे आलं मनात. त्याचदिवशी, ऑफिस आणि घरी , दोन्ही ठिकाणी सांगून टाकलं. ऑफिस मध्ये काही जणांना आणि घरी फक्त आईला वाईट वाटलं. त्यानंतर ४-५ दिवसांनी ऑफिसमधलं उरलं सुरलं काम संपवलं. घरी बॅग भरून ठेवली होती. ठरलेल्या दिवशी न निघता २ दिवस आधीच निघाले. बाकी सर्व झोपलेले असताना. " पूजाचे बोलणे संपले. कादंबरीच्या डोळ्यात पाणी आलं.
" ये वेडाबाई .... रडते का... हीच आहे माझी स्टोरी... आणि असं रडायचं नाही. मी बघ, ते घरी असताना फक्त एकदा रडली होती, ते शेवटचं. त्यानंतर कधीच रडली नाही. " कादंबरीने डोळे पुसले. 

" एकटीच निघालीस ... तेही रात्रीची... भीती नाही वाटली का , मी निघालेली ना .... तेव्हा जाम घाबरली होती. " ,
" त्या रात्री स्टेशनवर थांबलेली. सकाळी डब्बू होता सोबतीला... " ,
" डब्बू ?? हा कोण नवीन ... कहानी मे twist का ... " पूजा हसली त्यावर.
" नंतर सांगीन . बघ ... बोलता बोलता किती रात्र झाली. " रात्रीचे ८ वाजले. दोघी पुन्हा आपल्या ग्रुपजवळ आल्या. 
=====================================================================

            सुप्री - संजना एका गावात रात्रीच्या मुक्कामी थांबल्या होत्या. तस बघावं तर खूप अंतर पार केलेलं दोघीनी. दिवसभरात आकाशला फोन तर लागला नाहीच. आकाशला माझा मेसेज मिळाला असेल तर बर होईल. पण कुठे थांबला असेल तो. त्याला एक फोन लागला असता तर किती बर झालं असत. असा विचार करून सुप्रीने पुन्हा आकाशला कॉल करण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा लागला नाही, पुन्हा लावला. त्यावेळीस मात्र लागला कॉल. रिंग वाजत होती, आकाश कॉल उचलत नव्हता. तसाच फोन वाजून वाजून बंद झाला. सुप्रीला वाईट वाटलं. संजना बोलते ते खरं आहे का ... आकाश विसरला का आपल्याला. तशीच बसून राहिली मग. 

आणि आकाशचा फोन आला. " हॅलो ... हॅलो... कुठे आहेस तू .. फोन का नाही उचलत... बरा आहेस ना ... कुठे आहेस .. " एका मागोमाग एक प्रश्न सुरु झाले सुप्रीचे.
" हो .. हो .. श्वास तर घेशील जरा.... शांत हो... " आकाशचा आवाज ऐकून सुप्री शांत झाली. " मी एकदम ठीक आहे. तू कशी आलीस इथे ... एकटी आहेस कि कोणी आहे सोबतीला... " ,
" संजना आहे कि सोबत. तुलाच बघायला आले मी. तू , त्या फोटोग्राफी कॅपला गेला नाहीस ते समजलं. त्यामुळेच तुला शोधत आली. आता नक्की कुठे आहेस तू.. ",
" मला माहित नाही गं ... खूप वर्षांनी आलो आहे या भागात मी. ओळखीचे आहे ठिकाण पण नाव नाही माहित. इथे एका देवळात थांबलो आहे. " आकाशने सांगितलं.
" मलाही माहित नाही मी कुठे आहे ते , सकाळ झाली कि विचारेन कोणाला तरी... कोणते देऊळ आहे " ,
" गणपतीची मूर्ती आहे. तस गावापासून दूर हे ते मंदीर. बघ, गेल्या २ दिवसात मी कुठे गेलो नाही या देवळातून आणि इथे कोणी आलेही नाही देवळात " ,
" ठीक आहे , मी विचारते असे कोणते मंदिर आहे का ... तू थांब तिथेच ... मी येते .. नको जाऊस कुठे आकाश... " पुढे काही बोलणार आणि फोन कट्ट झाला . कदाचित पुन्हा नेटवर्क गेले. 

        आकाश त्या मंदिरातून पाय मोकळे करायला बाहेर आला. वाहणाऱ्या थंड हवेसोबत कुठेतरी रातराणी फुलल्याचे कळत होते. खाली गावात दिवे लागलेले होते. एक एक घरकुल उजळलेले होते. अजून तरी इथे वीज आलेली नसावी किंवा लोडशेडिंगचा प्रकारही असावा. तरी छान वाटते ना. त्या लहानग्या मिणमिणत्या दिव्यांचा प्रकाश इथंपर्यंत येतो आहे. शांत- शीतल.... वर आभाळात सकाळ पासून धरून राहिलेला पाऊस , कुठे गेला कुणास ठाऊक. त्यात अमावस्या, चंद्राची अशी सोबत कधी कधी छान वाटते. चांदण्या काय ... लपाछपी खेळात सारख्या ... असंच वाटते. लुकलुक सुरु असते नुसती त्यांची. सुप्रीचा विचार आला अचानक. कशाला आली एवढ्या दूर ती. कि आपलंच चुकलं काही. आपणच तर ठरलेल्या ठिकाणी न जाता इथे भलतीकडेच आलो. तिच्याही त्या अपघाताच्या आठवणी ताज्या आहेत. पुन्हा कुठे हरवलो तर मी... काळजी वाटणारच ना.. 

      पुन्हा देवळात आला. काही फळे घेतलेली त्याने. तीच खात होता गेले २ दिवस. आणि लक्ष गेलं त्या गणूच्या मूर्तीकडे. " तुला कोणी भेटायला येतंच नाही का... एकटाच असतोस का इथे... " आकाशने गणूला मनातल्या मनात प्रश्न केला. साहजिकच आहे ... उत्तर मिळालं नाही. गणू तर चेहऱ्यावर एक छानसे हास्य घेऊन बसला होता. आकाश किती वेळ त्याच्याकडे पाहत होता. तू तरी काय बोलणार म्हणा. पण एक सांग जरा ..... सुप्रीला लहानपणापासून ओळखतॊस ना तू ..तिचाच गणू आहेस ना तू ... तुला कधी कळली आहे की ती... मला तर अजिबात कळत नाही ती... स्वतःच पाठवलं बाहेर आणि आता मागे मागे आली सुद्धा. माणसांनाच असे स्वार्थ असतात ना ... प्रत्येक जणं कश्या ना कश्या साठी पळत असतो. सुख कश्यात आहे, कळतच नाही कधी. आपली माणसं सोबत असणे कि स्वतःच्या शोधात फिरणे , हे सुख... तुला उत्तर मिळालं तर नक्की सांग मला, आकाश पुन्हा त्या देवळात झोपी गेला विचार करत. 
=====================================================================

             पहिल्या दिवशी जो पाऊस झाला, त्यानंतर ३ दिवस पाऊस झालंच नाही. आज सकाळी जरा वाटतं होते पावसाचे. तरी काही चिन्ह दाखवून पुन्हा पसार झाला तो. कदाचित कुठे दूरवर पडत असेल पाऊस. या भागात यायचे नसेल त्याला, असा विचार करत कादंबरी सकाळ सकाळीच तिचा कॅमेरा घेऊन जरा लांब आलेली. त्यांच्या ग्रुप मध्ये आणखी काही लोकं सर्दी - खोकला ताप घेऊन बसले होते पावसाचे. ते काय दरवर्षीचे , म्हणत कादंबरी फोटो काढत चालली होती. एका ठिकाणी उभं राहून कॅमेऱ्याच्या लेन्सने, जरा zoom करून दूरचे काही दिसते का ते पाहू लागली. कॅमेरा डावीकडे वळला आणि तिला एक जण हातात कॅमेरा आणि पाठीला सॅक, असा काहीसा दिसला. लगेच तिने कॅमेरा खाली केला. खरच , तिथे कोणीतरी होती फोटो क्लिक करत. इतक्या दूरवर ... कोणी खास फोटो साठी तर येत नाही, हे कादंबरीला एवढ्या वर्षाच्या भटकंतीतून कळलं होते. नक्कीच हा वाट चुकला असेल, जाऊया का त्याला विचारायला... नको ... एकटी नको... पूजाला घेऊन जाऊ.. असा विचार करत धावतच कादंबरी पूजाला आणायला पळाली. 

" अगं .... पण मी कशाला... " पूजा वैतागत म्हणाली.
" चल नाआआआआ .... !!!! " ,
" कशाला पण आणि असेल कोणी .. ज्याला फोटोची आवड असेल... काढू दे त्याला फोटो... त्या खालच्या गावातला सुद्धा असू शकतो. " ,
" तुला बोलवायचे म्हणजे आधी अर्धा किलो मस्का लावावा लागतो तुला ... त्यानंतर तयार होते तू... कोणी वेगळा दिसतो आहे म्हणून आले ना सांगायला. एकटी गेली आणि किडनॅप केले तर मला त्याने... " पूजाला हसायला आले त्यावर.
" हा .. हे मात्र होऊ शकते हा ... एवढी गोड आहेस ना , कि कोणालाही मोह होईल तुला पळवून नेण्याचा.... लाडाची बाय माझी ... " पूजाने कादंबरीचा गालगुच्चा घेतला.
" चल ना गं पटकन ..... एकतर तो वाट हरवला आहे त्याची.. पुन्हा कुठे पुढे गेला तर अजून चुकेल ... चल पटापट ... " ,
" हो .. माझी आई ... हो ... " पूजाने हातातले काम बाजूला ठेवलं आणि उभी राहिली. " इतकं काय विशेष वाटलं तुला त्यात.. " असं बोलत होती आणि अचानक आभाळात लक्ष गेलं. मघापासून मोकळं असलेलं आभाळ अचानक अंधारून आले. " कमाल आहे ना.  आता तर काहीच नव्हते ना... लगेच कुठून आले हे ढग.. " कादंबरीही वर पाहू लागली.
" बघ ... सगळं तुझ्यामुळे ... !! आता पाऊस आला तर तो निघून जाईल. " ,
" चल बाबा चल ... तू ना .... ऐकणार नाहीस कधी, मी सांगते ना .. गावातला असणार तो.... ",
" गावातले लोक काय पाठीवर सॅक आणि गळ्यात कॅमेरा लावून फिरत नाहीत.. " कादंबरीच्या या वाक्यावर पूजा थांबली. " तो " आलाय का पुन्हा , नसेल ... तो नसावा... असेल तर.. पूजाने चालण्याचा वेग वाढवला. दोघी त्याठिकाणावर आल्या. जिथे कादंबरीने त्या व्यक्तीला पाहिलं होते. आता तर कोणीच नव्हते तिथे. 

" कुठे आहे कोण ... " पूजा आजूबाजूला नजर टाकत म्हणाली. कादंबरीही कोड्यात पडली. " गेला असेल का तो ... पावसाला घाबरला असेल... " कादंबरी बोलली. मग तिचं लक्ष पुढे असलेल्या देवळाकडे गेलं.
" त्या देवळात बघूया का .. " ,
" तिथे का जाईल तो ... " म्हणत पूजाच पुढे गेली. ५- ६ पावलं पुढे गेली असेल आणि लख्ख प्रकाश झाला. वीज चमकली होती. जोराचा पाऊस येणार आता, असा विचार मनात आला आणि समोर कोणीतरी उभा.. त्याचे हि लक्ष यांच्याकडे होते. " तो बघ ... त्यालाच पाहिलं होते मगाशी.. " कादंबरी बोलत होती, पण पूजाच लक्ष कुठे होते तिच्याकडे.. 

आणि रिमझिम पाऊस सुरु झाला. कादंबरी कॅमेरा वाचवण्यासाठी त्या मंदिरात शिरली. पूजा आणि "तो " मात्र तिथेच .. .... आकाश !! आकाशच आहे ना ... हो ... तोच असणार ... पाऊस आणि तुझं नातं तसं जुनंच... बघ तुझ्या सोबतीनेच फिरतो आहे... घेऊन आलास ना पावसाला ... पूजा कधीची आकाशला पाहत होती. तोही कधीपासून पूजाकडे पाहत होता. पावसाचे थेंब रिमझिम रिमझिम पडत होते दोघांवर .... पूजाला मात्र ते सर्व क्षण थांबल्या सारखे वाटतं होते.आजूबाजूला पडणारे पाण्याचे थेंब गोठलेले भासत होते. झाडे - झाडांची पाने ... दूरवर चमकणारी वीज ... वारा ... सारेच थांबले होते. समोर घडणारा प्रत्येक क्षण गोठला होता. धावत जावे आणि मिठी मारावी त्याला, असं वाटतं होते पूजाला. पण तीही गोठली होती जागेवर. आकाशच पुढे आला मग. दोघे एकमेकांसमोर. किती वेळ, पावसाचा वेग जरा वाढला तसा कादंबरीने आवाज दिला.
" ये ... दोघांनी आत या आता .... भिजून आजारी पडलात तर मला एकटीला ताकद नाही एवढी .. तुम्हा दोघांना उचलून आणायची. " दोघीही भानावर आले. आणि धावतच देवळात आले. 

देवळात आले तरी तसेच दोघे. शेवटी कादंबरी वैतागली.
" पूजा ... काय सुरु आहे... त्याला ओळखते का तू... किती वेळ बघते आहे मी, नुसते एकमेकांकडे बघत आहात ... हॅलो .... मीही आहे इथे ... " पूजाला हसू आलं.
" थँक्स ... बबडू ... तुझ्यामुळे मला माझा डब्बू भेटला ... इतक्या वर्षांनी.... " पूजाने कादंबरीला मिठी मारली. कादंबरीने त्याला न्याहाळून पाहिलं.
" डब्बू .... कोण ??" कादंबरी विचारात पडली.
" कशी आहेस निर्मला... " त्याने पूजाकडे पाहत विचारलं.
" निर्मला कोण आता ... काय सुरु आहे नक्की ... वेडी होणार वाटते मी ... " कादंबरी आणखी confused ...
"बस बस ... खाली बस आधी... डोक्याला इतकं tension नको देऊ.. तू जरा बस शांत ... मला डब्बू ला भेटू दे... इतक्या वर्षांनी पाहते आहे त्याला... " , 
" एक मिनिट ... " कादंबरीने पूजाचा हात पकडला. " मला सांग आधी , काय सुरु आहे हे.... मला तो दिसला , वाट हरवला असेल म्हणून तुला घेऊन आले. तर लगेच ओळखीचा निघाला ... असं कुठे घडते का कधी ... खरं आहे कि कोणता प्रॅन्क आहे हा .... " कादंबरी आता आकाशकडे संशयाने पाहू लागली. 
"अगं ... प्रॅन्क कसला... तुला सांगत असते ना याच्याबद्दल ... "तो " .... हाच ... डब्बू ... माझा डब्बू ... " ,
" हा ... ' तो '... तो आहे ... हा " कादंबरी आकाशकडे पाहत राहिली. त्याच्याजवळ गेली. " Hi ... मी आकाश.. " आकाशने कादंबरीकडे हात पुढे केला.
" डब्बू कोण मग आणि मघाशी पूजाला तू ' निर्मला ' का बोललास " आकाशला हसू आलं. बाहेर पावसाने छानच सुरुवात केलेली.
" बसूया का खाली. आता पावसात तरी तुम्ही दोघी बाहेर जाणार नाही. " आकाशसुद्धा खाली बसला. 
"हम्म ... आता सांग .. हि काय भानगड आहे नावांची. "..... कादंबरी ...
" याचे खरे नाव आकाश.. याची आई याला लहानपणापासून डब्बू बोलते लाडाने. म्हणून मीही तेच बोलते ... " .....पूजा ...
" आणि हिच्या आजीचे नाव निर्मला .... आजी सोबतच छान जमते हिचे ... लहानपणापासूनच स्वतःच तिने स्वतःचे नाव ' निर्मला ' ठेवले. मलाही तेच नाव जास्त आवडते. बाकी लोकांसाठी पूजा .. माझ्यासाठी मात्र निरू .... " आकाश पूजाकडे पाहत म्हणाला. 

"तर हे असं आहे तर गणित .... मलाही तिने ते नाव कधी सांगितले नाही कधी... असो , By the way ... तुला ओळखते मी , खूप आधीपासून .... " ,
" ते कस शक्य आहे ... मी तर तुला पहिल्यांदा भेटलो आज ... आणि निरूकडे माझा फोटोही नाही .... बरोबर ना निरू ... " पूजाने होकारार्थी मान हलवली.
" हि सांगत असते तुझे किस्से... आठवणी... नाव सांगितलं नाही हा कधी तिने ... सारखं सारखं ... तो असा करायचा , तो तस करायचा... तुला कधी बघितलं नाही तुला , तरी ओळखायची. nice to meet you .. " कादंबरीने हात पुढे केला. आकाशने हात पुढे केला.
" तुझी ओळख ?? " ,
" मी कादंबरी ... या पोरीची best buddy ... " आकाशला छान वाटलं. पूजाकडे बघत विचारलं ....
" कुठे भेटली हि ,... छानच आहे ... " ,
" तू गेलास ना ... त्यानंतर ३-४ दिवसानी हि भेटली. भटकत होती. एकटीच होती म्हणून घेतलं सोबतीला. तेव्हापासून आहे सोबतच... " पूजा आकाशकडे पाहत होती.
" जरा जाडा झाला आहेस.. शेविंग पण करायला लागला आहेस... व्वा !! बदल छान आहेत .. कुठे निघाला आहेस आता.. खरं सांगावं तर कधीच वाटलं नव्हतं तुझी भेट होईल पुन्हा..... या वळणावर. " ,
" मी ... वाट बघतो आहे कोणाची तरी.... ",
" कोणी येते आहे का भेटायला ... कोणी मागे राहिलेले ... " पूजा ...
" हो .. !! " ,
" wow !! गोड बातमी दिलीस... लग्न कधी केलंस ... " पूजाला आनंद झाला.
" लग्न नाही .. पण relationship मध्ये आहे. मी पुढे आलो आणि ती मागाहून येतं आहे. छान आहे ती ... पण मीच आता confused आहे .. कोणी कोणाला अडकवून ठेवले आहे. मी तिला कि तिने मला... " आकाशचा आवाज गंभीर झाला. 

वातावरण गंभीर होताना बघून कादंबरी मधेच बोलली. " excuse me... तुम्ही दोघे सारखे का विसरता मला. मी सुद्धा आहे इथे ना ... ते बाकी जाऊ दे ... तुला मघाशी कॅमेरा वापरताना पाहिलं ... तू फोटोग्राफर आहेस का ... हि पूजा ... i mean निरू .... तुझ्याकडून फोटोग्राफी शिकली असे सांगायची. मला पण शिकावं ना.. " कादंबरी हात जोडत होती.
" हो रे ... डब्बू ... छान काढते हि फोटो... दाखव जरा हिला फोटोग्राफी... पण नंतर. आता जरा आपणच गप्पा मारू.. सांग .... कसा आहेस... आणि हो.. पाऊस आणि तुझं नात तसेच आहे हा अजून .... अगदी सुरुवातीला होते तसे. बघितलं ना ... तुझ्यासोबतच फिरत असतो.. " आकाश हसला त्यावर.
" अरे हो ... बाकीचा ग्रुप कुठे आहे ... आहेत का सर्व अजून सोबतीला.. " ,
" आहेत कि ... " पूजा म्हणाली. तोपर्यंत पाऊस थांबला होता. या दोघींसहित आकाश त्यांना भेटायला गेला. 
=====================================================================

सुप्री -संजना भरभर चालत होत्या. आकाशने सांगिल्याप्रमाणे एक मंदिर होते, त्याकडे निघाल्या होत्या. सुप्रीला तर आकाशला कधी बघते आहे असे झाले होते. एक वेगळीच फीलिंग घेऊन चालत होती ती. आकाश बोलला तसे एक मंदिर दिसले तिला दूरवर . तशी धावतच गेली मंदिराकडे. मंदिरात पोहोचली तर कोणीच नव्हते तिथे. " आकाशने खरं सांगितलं कि पुन्हा फसवलं. " संजना बोलली आणि पाऊस सुरु झाला पुन्हा. जोराचा पाऊस. सुप्री आकाशला फोन लावायचा प्रयत्न करत होती. तिच्याच मोबाईलला नेटवर्क नव्हते.
" आता काय करायचे गं संजू ... हा असा का वागतो आहे आकाश .... गणू ... please help ... " संजना तरी काय बोलणार. पावसाने हि चांगलाच वेग पकडला होता.
" आता कुठे जायचे सांग सुप्री.. आकाश तर नाही... किंवा तो दुसऱ्या कोणत्या तरी देवळात थांबला असेल... एकच देऊळ आहे का हे ... बरोबर ना ... " संजनाचे ते बोलणे सुप्रीला पटलं.
" तस असू शकते... " आकाशच्या विचारातून बाहेर आली आणि तिला पावसाचे लक्षात आलं. तो काय इतक्यात थांबणार नाही हे समजलं तिला. धो - धो कोसळत होता नुसता. " इथेच थांबूया ... या पावसाचे काही खरं नाही बघ.... " सुप्री आभाळाकडे पाहत म्हणाली. गावातून निघताना आणलेले पदार्थ खाल्ले. आणि दोघी तश्याच बसून राहिल्या , पाऊस थांबण्याची वाट पाहत. 
पाऊस थांबता थांबता संध्याकाळ झाली. आता पुढे तर जाऊ शकत नाही. काळोखात कुठे जाणार , त्यात पाऊस आला तर भिजायला होईल. देवळात तरी कोणी नाही, त्यामुळे इथेच थांबलो आजची रात्र तर बर होईल. असा विचार करत दोघी तिथेच थांबल्या आणि रात्रीची तयारी करू लागल्या. 

पावसाने आवरतं घेतलं तस आकाशने लगेचच त्याचा तंबू यांच्या तंबू शेजारीच उभा केला. दिवसभरात छान गप्पा झाल्या सर्व ग्रुप सोबत. पण पूजा सोबत नाही. काळोख झाला तसं आकाशने आधीच जमवून ठेवलेली लाकडं रचून शेकोटी पेटवली. उबदार असे काही पाहिजे होते सर्वाना. शेकोटीजवळ येऊन बसले सर्व. पुन्हा गप्पा सुरु झाल्या. आकाशला तो सर्व ग्रुप ओळखीचा. २ वर्ष होते ना एकत्र ते सर्व. गप्पा तर काय संपणार नव्हत्या. शेवटी कादंबरीला भूक लागली आणि सर्वांना जबरदस्ती तिने जेवायला नेले. जेवण झाल्यावर आकाश पुन्हा शेकोटी जवळ येऊन बसला. एकटाच , या वेळेस एकटाच बसला होता. पूजा गेली त्याच्या शेजारी.
" कसला विचार सुरु आहे तुझ्या डोक्यात. सकाळपासून बघते आहे तुला.. " आकाश काही बोलणार तर पूजाने थांबवले. " आता काही नाही , असं बोलून चालणार नाही.. तुला खूप आधी पासून ओळखते मी... सांग .. डोळ्यात आणि चेहऱ्यावर तणाव जाणवतो. काय झालं ... " आकाश शेकोटीतल्या जळणाऱ्या लाकडांकडे पाहत होता. 

" तीच नाव सुप्री ... सुप्रिया.... योगायोग बघ.... आपण जेव्हा वेगळे झालो होतो ना ... म्हणजे तुझी माझी वाट वेगळी झालेली तेव्हा.. त्याच वर्षी ... किंबहुना त्याच पावसात मला सुप्री भेटली. आपण निघालो वेगवेगळ्या वाटेने तेव्हा सुद्धा पाऊस होता आणि सुप्री भेटली ती सुद्धा अश्याच एका प्रवासात... छान मुलगी आहे.. भावुक आहे , हसरी आहे ... पण प्रचंड strong आहे. कितीतरी कठीण परिस्तिथीत तिने स्वतःला कसे सावरले , ते तिलाच माहित. मलाही अपघात झालेला, तेव्हा तर माझी स्मृती गेलेली. काहीच आठवत नव्हते , तिच्यामुळे वाचलो असे म्हणू शकतो. " ,
" खूप छान जोडीदार भेटली आहे तुला ... ",
" तेच कळत नाही. आता सुद्धा तिचाच विचार आहे मनात. कुठे असेल ती. मी इथे येऊन चूक तर नाही केली ना.. मी ठरलेल्या ठिकाणी न जाता इथे आलो. त्यासाठी माझ्या काळजी पोटी ती इथे शोधत आली. नक्की कुठे चुकते आहे माझं ... मलाच कळत नाही. " पूजा काहीच बोलली नाही त्यावर. 

थोडावेळ शांततेत गेला. " तू कुठे निघाली आहेस. कुठे चालला सर्व... " आकाशने पूजाला प्रश्न केला.
" योगायोग बोललास ना मघाशी... इथेही आहे योगायोग... इथेच आपली ताटातूट झालेली. तोच प्रवास आहे हा.. आठवलं का काही... " आकाशने नकारार्थी मान हलवली. " आपण त्याच देवळात बसून शेवटच्या गप्पा मारल्या होत्या. कदाचित तुला जो अपघात झालेला ना .. त्यात या आठवणी विसरला असशील... पण मला आठवते सर्व. " आकाशला काही आठवलं.
" स्पष्ट नाही.... पण अंधुक आठवलं , तू बोललीस तेव्हा.... एक मिनिट ... म्हणजे तू ... तीथे निघाली आहेस का .... " आकाश पूजाकडे पाहत म्हणाला.
" हो ... तो प्रवास नंतर पूर्ण झालाच नाही... तुही गेलास , तेव्हा मीही वाट बदलून दुसरीकडे निघून गेलेली. या वर्षी निघाले ना निरोप घेऊन , तेव्हा आजीनेच आठवण काढली आजोबांच्या प्रवासाची... त्यांच्या त्या जुन्या गावाची , त्याच्या मोठ्या वाड्याची... तेव्हाच ठरवलं तो प्रवास पूर्ण करावा... हे सर्व तयार झाले. आणि निघाली. पण सारखं वाटत होते, तू पुन्हा आला पाहिजे... देवाने .... पावसाने ऐकलं माझं ... " आकाशला गंमत वाटली पूजाचे ऐकून. 

" एक चक्र पूर्ण झालं ना ... निरू ... पण या काळात, मी राहिलो का आठवणीत तुझ्या... कादंबरी बोलली ते खरं का ... तिला सांगत बसायची माझे किस्से.. " ,
" हो ... म्हणजे सारखी नाही... पण काही क्षणांना आठवण यायची तुझी. तेव्हा सांगायची कादंबरीला. आणि तुला कोण रे विसरणार.. मीच काय .. हे ग्रुपमधले बाकी कोणीच विसरले नाहीत. " आकाशला छान वाटलं ते ऐकून.
" तुम्ही कधी निघणार आहात प्रवासाला... " आकाशने पूजाला विचारलं.
" माहित नाही.. कदाचित उद्याचा दिवस थांबू.. आणि तुझं काय... माघारी जाशील का सुप्री आली कि.... " आकाश काही बोलला नाही त्यावर. किंबहुना त्याला बोलायचेच नव्हते त्या विषयावर. पूजाला कळलं ते. " चल झोपूया ... बाकीचे गेलेही झोपायला. " पूजा उभी राहिली. आकाश त्या शेकोटीकडे पाहत होता. काहीतरी घालमेल सुरु आहे याच्या मनात, पूजा मनातल्या मनात बोलली. झोपायला निघून गेली. आकाश उशिरापर्यंत शेकोटीपाशी बसून होता. 

सकाळ झाली. सुप्रीने अंदाज घेतला पावसाचा. पाऊस नाही येणार आता तरी. तोपर्यंत पुढे जायला हवे ना ..... तयारच होती ती. संजनाची तयारी झाली आणि दोघींनी देवळातून पाय बाहेर काढला. लगेचच आकाशला कॉल लावला. पहिल्या वेळेतच कॉल लागला.
" हॅलो .... हॅलो ... आकाश... कोणत्या मंदिरात आहेस. मी कालच एका मंदिरात जाऊन आली. तू नाही दिसला तिथे... नक्की कुठे आहेस ते सांग... " भरभर बोलून गेली.
" मी देवळात नाही आहे आता ... जरा पुढे आलो आहे. " हे ऐकून सुप्री संतापली.
" अरे ... !! याला काय अर्थ आहे , इतकं सांगून सुद्धा पुढे गेलास तू... मी येते आहे असं बोलली होती ना तुला ... तरी ... "  ,
" सुप्री .... शांत होशील का जरा ... मी .... " अचानक फोन कट्ट झाला. पुन्हा लावला तर लागलाच नाही. सुप्रीच्या डोळ्यात पाणी आलं.
" काय झालं सुप्री .... आकाश सोबत आधी अशी , या स्वरात कधी बोलली नाहीस ... ",
" चुकलं गं माझं... राग आला त्याचा... म्हणून ओरडली त्याला. बघ ना , पुढे गेला आहे तो ... त्याला इतके मेसेज पाठवले , कॉल करून सांगितलं थांब तरी पुढे गेला.. राग नाही येणार का ... " सुप्री जागीच थांबली. 

" का थांबली... "..... संजना.
" अगं .. पुढे तरी कुठे जायचे.... मोबाईल लागत नाही त्याला . तो नक्की कुठे गेला , कुठे आहे ते माहित नाही.... जायचे तरी कुठे मग ... " ते ऐकून संजनालाही प्रश्न पडला. संजना आजूबाजूला पाहू लागली. दूरवर काही तंबू दिसले तिला.
" चल .. तिथे काही लोकांचा ग्रुप दिसतो आहे .. फिरायला आले असतील. त्यांना विचारू पुढचा रस्ता." संजना बोलली पण सुप्री तयार नव्हती. संजना ओढतच घेऊन गेली तिला. जास्त पुढे गेल्या नसतील त्या. त्यांना एक मुलगी फोटो काढताना दिसली.
" Hi ,.... मी संजना... आम्हाला जरा इथली माहिती मिळेल का ... " ,
" हो .. हो , का नाही... कुठे निघाला आहात... By the way ... मी कादंबरी... " कादंबरीने हात पुढे केला.
" कुठे जायचे आहे तेही नाही माहित मला " संजना बोलली. कादंबरी या दोघींच्या तोंडाकडे पाहू लागली.
" Actually , तुमच्याकडे मोबाईल आहे का .. " सुप्रीच बोलली शेवटी.
" आहे पण इथे नेटवर्क नसते. " कादंबरी बोलली. सुप्रीचा चेहरा पडला. कादंबरीला काही सुचलं.
" तुम्ही दोघींनी काही खाल्लेलं दिसतं नाही. चेहऱ्यावरून कळले मला . तुम्हाला भूक लागली आहे ते. तो तिथे आमचा कॅम्प लागला आहे. चला काही खाऊन घ्या.... जरा आराम करा. शिवाय माझी friend तुम्हाला माझ्यापेक्षा चांगली माहिती देऊ शकते या भागाची. " त्या शेवटच्या वाक्यावर सुप्री तयार झाली. 

" तुम्ही थांबा इथेच... " कादंबरीने सुप्री -संजनाला कॅम्प जवळ आणले. " मी माझ्या friend ला बोलवून आणते , ती मागच्या बाजूला जेवणाची तयारी करते आहे. " कादंबरी निघून गेली. तितक्यात सुप्रीचे लक्ष सर्वात शेवटी असलेल्या तंबूकडे गेलं.
" संजू .... आकाशचा tent ... " संजनाने बघितलं त्यादिशेने.
" नसेल गं ... रंग सारखा असला कि काय तो आकाशचा tent असणार का ... काही पण तुझं ... ",
" नाही.. मला माहित आहे ना ... आकाशचाच tent आहे तो ... चल ना जवळ जाऊन बघू ... सुप्री बोलली आणि निघाली सुद्धा. तंबू जवळ पोहोचली. आणि आत वाकून बघणार तोच कादंबरीने तिला हाक मारली.
" काही पाहिजे आहे का ... " सुप्रीला विचारलं तिने.
" नाही सहजच ..." पूजा आली मागोमाग.
" Hi ... मी पूजा.. कादंबरी बोलली तुम्ही रस्ता चुकलात.... " पूजा या दोघींना संबोधून म्हणाली.
" हो हो ... जरा पुढे कोणते गाव , वाट आहे ते सांगशील का ... " संजनाच बोलत होती. सुप्री वाकून वाकून त्या tent कडे पाहत होती. पूजाच्या नजरेतून सुटलं नाही.

" काय झालं ... मागे काय ... " पूजाने विचारलं.
" तो तंबू कोणाचा आहे ... ओळखीचा वाटतो. " ,
" माझ्या जुन्या मित्राचा....." ,
" नाव ... का .... य .... त्याचे ... " सुप्री पुढे विचारत होती आणि मागून आकाश आला. कानाला मोबाईल लावलेला. सुप्रीलाही त्याने पाहिलं. सुप्री पुढे आली. आता आकाश - सुप्री समोरासमोर. पूजा - कादंबरी- संजना... एका बाजूला झाल्या. " आकाश !! " सुप्रीने आकाशला मिठी मारली. कादंबरी पुन्हा confused.
" हॅलो .. excume me ... तू त्याला कशी ओळखते. तो तर आताच आला ना समोर... " आकाशने सुप्रीची मिठी सोडवली.
" निरू .... हीच सुप्री.. आणि तुझ्या शेजारी उभी आहे ना ... ती संजना ... माझ्या best friends " पूजाला तसे सांगितले होते आकाशने सुप्री बद्दल.  कादंबरीला फक्त नाव माहित होते तिचे. आणि ती आकाशला शोधत येते आहे इतकंच माहित होते. आता तर दोघे समोरासमोर होते. 

" म्हणजे मी तर जोड्या जुळवणारी झाली तर.. पहिलं आकाश आणि पूजा ..... आता आकाश - सुप्री... तुम्ही सगळे काय get together खेळत आहात का ... " कादंबरी काहीही बडबडत होती.
" कसा आहेस ? " सुप्रीने आकाशला विचारलं.
" आहे ... ठीक आहे... " ...आकाश...
" निघूया का .... " ,
" कुठे ? " ,
" घरी ... शहरात... " सुप्रीकडे बघतच राहिला आकाश. पूजाला कळलं, पुन्हा याच्या मनात घालमेल सुरु झाली आहे.
" डब्बू .... या दोघी दमलेल्या , भुकेलेल्या वाटतात.... आराम करा आज. उद्या पाहिजे तर निघा ... चालेल ना सुप्री... " पूजाला सुप्री नकार देऊ शकत नव्हती. तरी आकाशच्या चेहऱ्यावरून काहीच कळत नव्हते. आकाशने त्या दोघींना त्यांचा तंबू उभा करून दिला. दुपारचे जेवण सर्वांनी एकत्र केले. सुप्री - संजनाची ओळख करून झाली सर्वांशी. कादंबरीचे छान जमले या दोघींशी. आकाश या काळात गप्पच होता. दुपारीच जेवण झाल्यावर निघून गेलेला तो कुठेतरी. 

" आकाशला पाहिलं का तू ... दिसत नाही तो ... " सुप्री आलीच विचारायला कादंबरीला .
" नाही ... पूजाला माहित असेल .. " ,
" कुठे आहे ती ... " ,
" चल दाखवते कुठे आहे ते ......  " कादंबरी सुप्रीला घेऊन मागच्या बाजूला आली. पूजा काहीतरी लिहीत बसली होती.
" ती काही काम करते आहे असे वाटते . " सुप्रीने दुरूनच पाहिलं.
" आमच्या दोघींचा ट्रॅव्हल ब्लॉग आहे ना... त्यात पूजा लिहिण्याचे काम करते आणि मी फोटोग्राफी. " ,
" खूप छान गं ... मग हे असे लिहून झाले आणि फोटो काढून झाले कि शहरात कधी जाता ... " ,
" नाही ... आम्ही नाही जात ... सर्व काम इथेच .... इंटरनेट वरून ... ",
" मग घरी कधी जाता ... ,"
" नाहीच जात... हे tent आहेत ना ... तेच आमचे घर .. " सुप्रीला काहीच कळलं नाही कादंबरी काय बोलते आहे नक्की..
" घरी का जात नाही ... " सुप्रीने दबक्या आवाजात विचारलं. कादंबरी smile केले फक्त.
" आहेत काही कारणे ....जाऊ दे ते ... " पुजाजवळ आल्या दोघी.
" ये पोरी ... तुझा डब्बू कुठे गेला ते सांग हिला .... विचारत होती... " ,
" डब्बू ?? " सुप्रीला माहित नव्हते ते .
" अगं ... आकाश ना ... जरा पाय मोकळे करायला गेला आहे. संध्याकाळ पर्यंत येईल असं बोलून गेला. तुला काय न सांगता गेला का तो ... येईल .... येईल ... " सुप्री उगाचच खोटं खोटं हसली. कादंबरी तिचा कॅमेरा घेऊन गेली आणि पूजा तिच्या लिखाणात गढून गेली. 

सुप्री संजना शेजारी आली. संजनाचे भरपेट जेवण झाले होते. तिच्याच तंबूत झोपली होती. सुप्रीला पाहिलं तिने.
" काय ग ... चेहऱ्यावर १२ का वाजले आहेत.. " ,
" त्या आकाशचं काही कळत नाही.... असं वाटते मला टाळतो आहे तो .... " ,
" असं काही नाही आहे . उगाचच इतका टोकाचा विचार करू नकोस .... " संजनाने जरा रागातच उपदेश केला. सुप्री गप्प बसून राहिली. संध्याकाळ झाली आणि आकाशचे आगमन झाले. कोणाशी काही न बोलता त्याच्या तंबूत जाऊन बसला आणि त्याचा दरवाजा लावून घेतला. सर्वच रात्रीच्या जेवणाच्या कामात असल्याने कोणाचेच लक्ष आकाश वर नव्हते. पूजाने मात्र पाहिलं त्याला. पण गेली नाही त्याच्याकडे. तीही विचार करू लागली. मागोमाग तिची शेपूट 'कादंबरी' आलीच. " भौ .... !! " कादंबरीने पूजाला घाबरवले. पूजाचे लक्ष नव्हते तिच्याकडे.

" आता कसला विचार करते आहेस ...... तुझा डब्बू भेटला तुला.... तू जिथे घेऊन जाते आहेस , तिथे यायला सर्व तयार आहेत. ... आता का टेन्शन... ",
" तस नाही गं ... डब्बूचा विचार करते आहे... वेगळाच भासतो... म्हणजे आधी होता मुक्त .... तसा अजिबात नाही. सतत तणावात वावरतो आहे. " कादंबरीला काय कळणार .
" जेवण होईल आता ..... जेवायला बोलावू का त्याला .. " ,
" मी बोलावीन... " ,
" आणि उद्या निघणार आहोत , ते तरी सांगितलं का त्याला.. " कादंबरीने आठवण करून दिली.
" जेवताना सांगीन सर्वाना... उद्याच निघू... तसेही ३ दिवस झाले , इथेच अडकून पडलो आहोत... प्रवास आणि चालणारे पाय .... कधीच थांबले नाही पाहिजेत ....." पूजा बोलून निघून गेली. कादंबरी आकाशच्या तंबू कडे पाहत होती.

           जेवायला बसले सर्व. आकाश अजूनही त्याच्या तंबूतच बसून. न राहवून पूजाच त्याला घेऊन आली. पूजा बद्दल , कादंबरीने सुप्रीला आधीच माहिती पुरवली होती. आकाश आला जेवायला. सुप्री शेजारीच बसला. थकलेला वाटत होता. कमीच जेवला. जेवताना पूजाने सांगितलं सर्वांना. " सर्वांनी लक्ष द्या... काही बोलायचे आहे. उद्या निघतो आहोत आपण पुन्हा प्रवासाला. तर तशी तयारी आताच करून ठेवा सर्वांनी. उद्या सकाळी लवकर निघू. आज सर्वानी लवकर झोपा. उद्या जर वातावरण चांगले असेल तर जास्त अंतर पार करता येईल. " जेवण झाल्यावर सर्वच आपापल्या तंबूत जाऊन बसले, उद्याची तयारी करत. आकाश अजूनही शांत होता. सुप्रीला त्याच्याशी बोलायचे होते. आज पुन्हा आकाश त्या शेकोटी जवळ बसून होता. 

संजनाला तसंच सोडून सुप्री आकाशपाशी आली. पूजा त्यांना दुरूनच पाहत होती. सुप्रीची चाहूल लागली आकाशला.
" बस ... जेवलीस ना पोटभर. " आकाशचा प्रश्न.
" हो ... पण तू नाही जेवलास ... तब्येत ठीक आहे ना.. सकाळी भेटल्यापासून काही बोलला नाहीस. दुपारी कुठे गेलास तोही आता संध्याकाळी आलास. मला वाटते .... " ,
" काय वाटते .... " ,
" मला टाळतो आहेस तू असं वाटते मला ... " या वाक्यावर सुप्रीकडे वळला.
" असं का आले तुझ्या मनात... आणि मला जर तुला टाळायचे असते तर मी आता कुठे आहे हे सांगितलंच नसतं तुला .... बरोबर ना ... " सुप्री गप्प ... नंतर बोलली ...
" यांना कसं ओळखतो तू ... ",
" माझा जुना ग्रुप आहे हा .. " ,
" कधी सांगितलं नाहीस यांच्याबद्दल ... " ,
" कधी विचारलं नाहीस तू ... माझ्या भूतकाळाबद्दल... "
सुप्रीला असा संवाद नवीन होता. आणि ते खरं हि होते. तिच्या आठवणीत तरी आकाश बद्दल कधी काहीच विचारलं नव्हते तिने. तात्पुरता हा विषय नको म्हणत सुप्रीने विषय बदलला. 

" उद्या हे जातील सकाळी , आपणही उद्याच निघूया का ... घरी जायला. " सुप्रीच्या या प्रश्नावर आकाशने उत्तर दिले नाही. खूप वेळ शांततेत गेला. " बोल ना आकाश !!.... " बोललाच आकाश.
" सुप्री ... मला ना काय झालं आहे माहित नाही... २ वर्ष मी यासर्वापासून दूर होतो. अचानक यात प्रवेश केला आणि सर्व जुन्या आठवणी दाटून आल्या. त्या अपघातात विसरलो असेन, पण आता सर्व आठवणी मला माझ्या समोर दिसतात ... असं वाटते माझ्या सर्व समोर घडते आहे. मी आठवणीत , भूतकाळात कधी रमत नाही, पण जेव्हापासून हा प्रवास सुरु केला आहे ना , तेव्हापासून वाटते कि त्या सर्व आठवणींनी माझे पाय जखडून ठेवले आहेत... समजते आहे ना तुला... फोटोग्राफी तर दूरच राहिली, मला धड रस्ते हि कळत नाही आहेत , सर्वच अनोळखी वाटतात .... असं वाटते हरवून जाईन यात मी... " आकाश डोकं धरून बसला. सुप्री अधिकच कावरीबावरी झाली.
" नको ना विचार करू इतका ... आपण जाऊ शहरात पुन्हा... नव्याने सुरु होईल सर्व.. ",
" कसं सांग ... तू आलीस इथे ... मागोमाग ... तेही मला आवडले कि नाही ते सांगू शकत नाही... तू आलीस , त्याचा आनंद मानावा कि मी पुन्हा शहरात जाईन त्याचे दुःख... मी काय करू सांग, तो गणू सुद्धा नुसता हसत बघत असतो माझ्याकडे .... काहीच मदत करत नाही... आणि शहरात गेल्यावर कस ठीक होणार आहे सर्व .. मन तर इथेच राहणार ना माझं ... " बोलता बोलता आकाश अचानक थांबला.
" काय झालं ... " सुप्री त्याला बिलगून बसलेली.
" मी आपल्या भविष्याचा काही विचार केला आहे.. एकदा का तुझ्यासोबत संसारात अडकलो कि हे असे फिरता येणार नाही मला. ",
" असं काही नाही... तू जाऊ शकतोस ... तुला वाटेल तेव्हा , वाटेल तिथे... तुला कोण अडवणार.... " ,
" नाही .... तू बोलते तेवढे सोप्पे नाही ते.म्हणूनच मी विचार केला. उद्यापासून हे सर्व निघतील पुढच्या प्रवासाला. कदाचित हि शेवटीच भटकंती असावी माझी, त्याच्या सोबत ती भटकंती पूर्ण करू दे मला. त्यानंतर मी कधीच म्हणजे कधीच अश्या प्रवासाचा हट्ट करणार नाही. " ,
" अरे पण ..... " ,
" प्लिज प्लिज  सुप्री ... नको थांबवू .. हाच माझा शेवटचा प्रवास ... त्याचाच विचार करत होतो दुपारपासून. विचार पक्का केला. तुही येणार असशील सोबत तरी चालेल. म्हणजे तुझ्याही काही राहणार नाही मनात. उद्या निघू सकाळीच. तुला जमणार नसेल तर तू जाऊ शकते शहरात. हा प्रवास संपवून तुला शहरातच भेटेन. झोपूया का आता .... तुला वेळ देतो आहे विचार करायला. उद्या पहाटे सांगशील , अशी अपेक्षा करतो. " म्हणत आकाश उठून निघून गेला. 

पूजाचे लक्ष या दोघांकडे होते. कादंबरीने विचारलं. " काय गं ... इतकं काय निरखून पाहते त्या दोघांना... ",
" असंच ... कदाचित वादळाची चाहूल असावी हि... " ,
" वादळ !! काही समजलं नाही मला... " ,
" आकाशच्या मनातले .. तो असा कधी नव्हता आधी. भीती वाटते ती त्याच्या मनातल्या भावनांची... उगाचच घाईघाईत कोणता चुकीचा निर्णय घेऊ नये त्याने असे वाटते... " पूजा झोपायला आली. 

पूजा पहाटेच जागी झालेली. निघायचे होते ना. तिनेच सर्वाना जागे केले. अंघोळ वगैरे करून सारेच तयारीला लागले. पूजाचे लक्ष आकाशच्या तंबूकडे गेले. तंबू नव्हता तिथे. नंतर तिने सुप्री - संजनाच्या तंबूवर नजर टाकली. तर त्याही तंबू गुंडाळत होत्या. नवल वाटलं तिला. " Hi ... " मागून आवाज आला. आकाश होता मागे.
" आवरले का सर्वांनी... झाले असेल आवरून तर निघूया का .. " आकाश पाठीवर सॅक चढवत बोलला.
" कुठे ?? " ,
" कुठे म्हणजे आपल्या पुढल्या प्रवासाला... " पूजाला काहीच कळलं नाही.
" जरा स्पष्ठ बोलतोस का डब्बू ... " तोपर्यंत सुप्री ही पूजा जवळ आलेली.
" सुप्रीला मी कालच माझा निर्णय सांगितला. आणि तो तिला पटला. तुझा तो अर्धवट राहिलेला प्रवास ... खरंतर माझ्यामुळे अर्धवट राहिलेला. तो प्रवास पूर्ण करणार आहे. तुमच्या सोबत. .... सुप्रीही तयार झाली आहे. " पूजाला ते ऐकून काय रिऍक्ट व्हावे ते कळत नव्हते. एक वेगळीच भावना तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होती.
" चल चल निरू .... जास्त वेळ नको दवडू. निघायला हवे ना ... " आकाश वेगळाच भासत होता.
" खरच का ... " मागून कादंबरी आली. " बर झालं ... आता पूजाच टेन्शन गेले.... " कादंबरी बोलली.
" चला .. मग ... निघूया .. थांबायचे नाही आता.. " आकाश बोलला आणि बाकी सर्व त्याच्या मागून चालू लागले. पण सुप्रीच्या चेहऱ्यावर काहीवेगळंच होते. पूजाच्या नजरेतून सुटलं नाही ते. पूजाला झालेला आनंद आता काळजीत बदलला. 

पूजाने सुपारीला एका बाजूला घेतलं. " तुम्ही तर शहरात जाणार होता ना... " सुप्री गप्पच होती. शेवटी बोलवं लागलं.
" आकाश बोलला , आपल्या लग्नापूर्वीचा शेवटचा प्रवास हा... तोच बोलला कि लग्नानंतर अश्या कुठल्याच भटकंती साठी हट्ट धरणार नाही. त्यानेच निर्णय घेतला कि हा शेवटचा प्रवास करावा. मीही काही बोलू शकली नाही त्याला. " बोलता बोलता तिलाही वाईट वाटलं. पूजाला शॉक बसल्या सारखं झालं.
" आणि तू काही बोलली हि नाहीस काही.. " सुप्री गप्प झालेली पुन्हा . सुप्रीला मागे सोडून भरभर चालत तिने आकाशला गाठलं.
" थांब डब्बू ... बोलायचे आहे तुझ्याशी... " आकाशने बाकी सर्वांना पुढे जायला सांगितले. कादंबरीसहित बाकी सर्वच पुढे चालत गेले. सुप्री -संजना मागून चालत आल्या. त्या दोघींना थांबवलं पूजाने.
" डब्बू ..... काय बोललास तू सुप्रीला.. शेवटचा प्रवास ... यानंतर कधी प्रवास करणार नाहीस... काय चाललय हे ... " ,
" हो ... घेतला मी तसा निर्णय... ",
" वेडं लागलं आहे का तुला ... तरी वाटलंच होते मला ... भावनेच्या भरात काही चुकीचा निर्णय घेणार तू ... तसंच झालं. " पूजा बोलली.
" नाही निरू .. " आकाशने पूजाच्या खांद्यावर हात ठेवला. " काहीच चुकीचं नाही आहे. मलाही हा प्रवास करायचा होता. निघतो आहे ना आता .... चल ... काहीच चुकलं नाही ... " ,
" अरे !! तरी सुद्धा ... " ,
" निरू ... नको बोलू काही आता ... मीही थकलो आहे विचार करून करून ... खूप वर्ष असाच जगत आलो ना ..मोकळा एकदम ... आता नाही झेपत हे विचारांचे ओझे... आभाळानेच का सर्वांना सामावून घेयाचे प्रत्येक वेळेस ... कधी कधी आपणही व्हावे आकाश  ... मगच कळते , भरलेल्या आभाळाचे दुःख काय असते ... " सुप्रीकडे पाहत आकाश बोलला. पूजा समजली. " चला निघूया ... सुप्री - संजना ... तुम्ही दोघी पूजा सोबत असणार या प्रवासात .. मला पुन्हा या ग्रुपच्या पुढे राहायचे आहे ... कदाचित .... शेवटच्या वेळी .. " आकाश निघून गेला पुढे. संजना - सुप्री - पूजा ... तिघी एकमेकींकडे पाहत ... थोड्यावेळाने त्याही निघाल्या. 
=====================================================================

तिथून खालीच असलेल्या गावात पोहोचले सगळे. विचारत विचारत निघाले. आकाशला माहिती हवी होती ती पूजाने सांगितलेल्या गावाची.कोणाला विचारले तर तसे कोणते गाव होते हेच कोणाला माहित नव्हते. त्यातल्या त्यात एकाने सुचवलं. गावच्या शाळेचे मास्तर, गावात तेच वयस्कर होते. त्यांना काही माहिती असल्यास , नाहीतर कोणालाच माहित नाही. जायचे तर होतेच. शाळेतच राहायचे ते, अशीही माहिती मिळाली.
" गावातले शिक्षक ... शाळेतच राहतात का... " कादंबरीचा आकाशला प्रश्न. या प्रवासाला सुरुवात झाल्यापासून कादंबरी आकाश सोबतच चालत होती. कादंबरीचा प्रश्न ऐकून आकाशला हसायला आलं.
" इतकी वर्ष फिरते आहेस ना ....निरू सोबत ... तरी माहिती नाही. " ,
" काय ते ... ",
" अगं ... असं कोणी शाळेत राहते का.... तो माणूस बोलला ना ... फार वयस्कर आहेत.... वय झालं म्हणून शाळेतच राहत असतील. रोजची दगदग कशाला... " बोलता बोलता सारेच त्या गावातल्या शाळेजवळ जमा झाले. आकाशने सर्वांना बसायला सांगितलं. आकाशने बाहेरूनच आवाज दिला.
" कोणी आहे का शाळेत .... गुरुजी ... !! गुरुजी आहेत का ... " आतून काहीच प्रतिसाद आला नाही.
" कदाचित , कोणी नसेलच आतमध्ये... " कादंबरीने शंका व्यक्त केली. आकाशला हि तसेच वाटले. " निघूया ... पुढे विचारू कोणाला तरी... " म्हणत आकाशने त्याची सॅक पुन्हा पाठीवर चढवली. आणि आतुन कोणीतरी बाहेर आले. वयस्कर होते तरी अजूनही फिट दिसत होते. हेच ते गुरुजी असावेत असा अंदाज आकाशने लावला.
" तुम्हीच ना गुरुजी ... " आकाशने विचारलं.
"  होय ...मीच... काही काम होते का ... " गुरुजींनी या सगळ्या ग्रुपकडे पाहिलं. १०-१५ लोकं. पुरुष-बायका ... " कुठून आलात ... तुम्हाला आराम करायचा आहे का शाळेत ... करू शकता ... नाहीतरी शाळेला सुट्टी आहे ... " ,
" नाही नाही .. गुरुजी .... आम्हाला एका गावाची माहिती हवी होती. " ,
" कोणते गाव ? " ,
" निरू .... इकडे ये .... " आकाशने पूजाला हाक मारली. " तुला माहित आहे ना त्या गावाचे वर्णन ... सांगून बघ यांना ... माहित असेल तर सांगतील. " पूजा पुढे आली. आणि पाठोपाठ सुप्री आकाशच्या शेजारी येऊन उभी राहिली.   

" गुरुजी .... माझे आजोबा सांगायचे मला , त्यांच्या गावाच्या गोष्टी.... मोठ्ठ गाव होते, बाजूला दोन नद्या १२ महिने वाहत असायच्या. आजूबाजूला डोंगर... ", पूजा  पुढे काही बोलणार तर गुरुजींनी मधेच तिचे वाक्य तोडलं आणि स्वतः बोलू लागले. " गावात मोठी मोठी झाडे.... सुखाने नांदलेले गाव... शेत जमिनींनी फुललेलं गाव... वाऱ्यावर डोलणारे गाव .... बरोबर ना " पूजा हरखून गेली.
" हो ... हो ... हेच .... तेच ते गावं.. तुम्हाला कस माहित ... हे असे माझे आजोबा वर्णन करायचे ... " ,
" आजोबा ... !! महाद्या.... हा..... महादेव नाव त्याच .... वाड्यातल्या महाद्याची नात का तू .... " गुरुजी आठवून आठवून बोलले.   
" हो ... आजोबांचा वाडा होता , असे सांगायचे ते ... महादेवच नाव आजोबांचे.... बरोबर ओळखलं तुम्ही ... " पूजा किती आनंदात होती.
" महाद्या आणि मी ... लंगोटी यार .. एकत्रच शिकलो ... त्यांच्या वाड्याशेजारी आमचे घर होते... मोठा वाडा .... गावाच्या मधोमध ... असं डोंगरावर उभे राहील कि त्याचा वाडा पहिला दिसायचा आणि वाड्याच्या गच्चीवर गेले कि पूर्ण गाव ... शेतं दिसायची... " पूजा खाली मांडी घालून बसली. 

" ते शहरात कसे बंगले असतात ... त्याही पेक्षा मोठा वाडा... वाड्यासमोर असं पसरलेलं अंगण... त्यात किती ती फुलझाडं .... बापरे !! तुझा आजोबा पैसेवाला होता हा .. " गुरुजी हसू लागले सांगताना. 
"त्याच गावात निघालो आहोत आम्ही.... ते गाव बघायचे मला ... तो वाडा बघायचा आहे ... " पूजा आनंदात सांगत होती.
" शक्य नाही ते ... " ,
" का ? " ,
" बघ .... आम्ही गाव सोडलं तेव्हा मी आणि तुझा आजोबा ... १०-१२ वर्षांचे होतो. आता मी झालो ७५ वर्षाचा... म्हणजे जवळपास ६० वर्ष तरी झाली आम्हाला गाव सोडून.. काय राहीलं असेल तिथे आता... कशाला जाता तिथे... ",
" पण गुरुजी ... असं ऐकलं आहे मी ... कि पूर्वीचे बांधकाम मजबूत असते ... " संजना बोलली.
" हो ... असते मजबूत ... तेव्हा गावात मी तरी कोणते घर पावसात पडलेले पाहिले नव्हते... तरी इतकी वर्ष कोणी राहत नाही तिथे ... काय सांगू शकत नाही ना ... काही राहील असेल तिथे... " ,
" आजोबा .... i mean गुरुजी... इतके छान गाव... का सोडले तुम्ही... मस्त होते ना .... सोडायचे कशाला... " कादंबरीने अडखळत प्रश्न केला.  

"त्या दोन नद्या होत्या ना ... त्यावर साऱ्या गावाचे पोट होते. एक वर्षी पाऊस खूप कमी पडला. आणि अचानक दोन्ही नद्यांचे पाणी कमी होऊ लागले. त्या वर्षी निभावले साऱ्यांचे. पण पुढल्या वर्षी तर झालंच नाही पाऊस. भरीस भर म्हणून दोन्ही नद्या एकदम गायब झाल्या. तेव्हाची जुनी लोकं बोलायची. नदी मार्ग बदलते नाहीतर पृथ्वीच्या पोटात जाते. तसेच झाले असेल काही. दोन वर्ष असाच भयंकर दुष्काळ पडला गावात. काहीच पिकलं नाही शेतात. पर्याय नव्हता. बरीच जनावरं , माणसं मेली. उरलेले होते ... ते सर्व हातात मिळेल ते आणि घेऊन जाता येईल असं घेऊन निघाले... सगळ्यांनीच गावं सोडला. " गुरुजी जुन्या आठवणी सांगत होते.
" सगळे या गावातच आले का ... " आकाशने विचारलं.
" नाही. ज्याला जी वाट आवडली तो त्या वाटेने गेला. हिचा आजोबा... त्याचे घरातले श्रीमंत होते. शहराकडे गेले. माझे बाबा , शिक्षकच होते. या गावात ओळख निघाली. राहिले इथे. बाकीचे माहित नाही. पण तुम्ही कशाला जाता परत तिथे... त्या महाद्याने पाठवले वाटते... आहे कसा आता तो ... " गुरुजी पूजाला विचारत होते.
" आजोबांना जाऊन ४ वर्ष झाली आता. " गुरुजींना वाईट वाटलं ... मित्रच शेवटी.    
" छान होता महाद्या... त्याच्याच अंगणात खेळत राहायचो आम्ही सारे मित्र. मी तर कधी त्याच्याकडे जेवायलाही असायचो ..... " गुरुजी आठवणीत रमले. " ते गाव उभे तरी असेल का माहिती नाही... हरवून गेले ते गाव. कोणाला माहीतही नसेल असे कोणते गाव होते कधी. " 
" आम्हाला पाहायचे आहे एकदा तरी .... आठवणीत ठेवायला. " आकाश बोलला. गुरुजी आठवू लागले .
" नक्की कुठे आहे ते सांगू शकत नाही. एवढ्या वर्षांनंतर त्याचा रस्ता लक्षात नाही आता. तरी हिचा आजोबा सांगायचा तसे गेलात तर ... गावाच्या बाजूला ३ डोंगर आहेत, ४ म्हणालात तरी चालेल. मधोमध गाव आहे ते. हे असे खाली जमिनीवरून चालत गेलात तर दिसणार नाही ते. या समोर डोंगर रांगा दिसतात ना ... तसे चालत गेलात तर दिसेल. डोंगरच्या मध्ये लपलेलं ,वसलेलं गाव.  " 

" चालेल गुरुजी ... आम्ही निघतो ... खूप खूप आभार !! "... पूजा ...
" एक सांगतो... ऐकून जा ... प्रवास सोप्पा नाही तो. तुम्हाला अश्या ठिकाणी जायचे आहे , जिथे कोणी जात नाही. काही लागली तरी मदत मिळणार नाही कोणाची. त्यात पावसाची सुरुवात. या भागात वादळे येतात वरचेवर. मी लहानपणी तशी वादळं अनुभवली आहेत. खडतर प्रवास आहे. " पूजा ते ऐकून उभी राहिली.
" गुरुजी , आता तर ठरवलं ना ... प्रवास तर करणारच पूर्ण... " निघाले सर्व . सुप्री यावेळेस आकाश सोबत चालत होती.
" मलाही या वेळेचा प्रवास कायमचा आठवणीत कैद करायचा आहे. " आकाश सुप्रीला बोलला. सुप्रीला खरंतर वाईट वाटलं. निव्वळ आपल्यासाठी त्याची आवड कायमची सोडणार आहे. असा विचार मनात आला आणि सुप्री जागच्या जागी थबकली. आकाश त्याच्याच धुंदीत पुढे चालत गेला. मागून संजना होतीच. तिनेच सुप्रीला सोबत घेतलं.  

त्या गुरुजींनी सांगितल्या प्रमाणे , यांनी सुरुवातीला समोर असलेल्या पठाराकडे कूच केली . आकाश - पूजा सर्वात पुढे.
" चल डब्बू... पळायची शर्यत लावूया का .... आठवले का ... आधीच ... " पूजाने आठवण करून दिली.
" हो हो .. अशी सपाट माळरानं दिसली कि पळत जायचो... पहिला कोण पोहोचते त्यासाठी. " ,
" चल ... लावूया का शर्यत .... " पूजाने पुन्हा विचारलं.
" तयार !! १ .... २ .... ३ .... " म्हणत दोघेही पळत सुटले. पूजाच्या ग्रुपला या दोघांची सवय माहित होती. कादंबरी, सुप्री -संजना यांना सोडून.
" यांना काय वेड लागलं आहे का ... " कादंबरीने सुप्रीला विचारलं. " तो वेडाच आहे आधीपासून ... फक्त आता मी आहे सोबत त्याच्या .... इतकाच काय तो फरक... " सुप्रीच्या बोलण्यातले दुःख जाणवत होते.  पूजा आणि आकाश धावत एका ठिकाणी पोहोचले. आकाश आधी पोहोचला आणि जागच्या जागी उड्या मारू लागला. अगदी लहान मुलासारखा ... केवढा तो आनंद झालेला त्याला. आकाशला तस हसताना पाहून सुप्रीला जुना आकाश आठवला. असाच हसायचा तो भटकंती करताना. त्याच ते असं हसणं ... गेल्या २ वर्षांनंतरचे असाव ना... शहरात असताना हसणे आणि आताचे हसणे, यात खूप फरक होता , कारण आता तो निसर्गात होता. सुप्रीने स्वतःलाच तो फरक समजावून टाकला.

गप्पा -टप्पा मारत दुपारपर्यंत पुढे चालत गेले. आकाश - पूजा ग्रुपच्या पुढे , बाकी सर्व मागे. सुप्री - संजना - कादंबरी रमलेल्या गप्पात. जणू काही जुन्या मैत्रिणी.
" तुम्हाला कसं जमते ... शहरापासून दूर राहायला. " संजनाने विचारलं कादंबरीला.
" सवय झाली .... निघाले तेव्हा घाबरली होती. आता चालून जाते सर्व .. " ,
" आकाशला कधी पासून ओळखते तू ... " आता सुप्रीचा प्रश्न.
" तुम्ही आलात ना .... त्याच्या आदल्या दिवसापासून... पूजाचा जुना मित्र आहे तो...  " , 
" तरी तुम्हाला कधी वाटतं नाही ... शहरात परत जाऊ असे ... " सुप्री.   
" आधी एक -दोनदा वाटलं ... त्या सोयी-सुविधा या अश्या ठिकाणी मिळत नाहीत. तेव्हा वाटलेलं ... कशाला आले इथे.. नंतर कळलं , हेच खरं जगणं... मनात काहीच राहत नाही अश्या वातावरणात, मुक्त जगायचं.... त्या पाखरांसारखं.... "   एक मोठ्ठा थवा वर उडत जात होता.
" किती छान वाटतात ना ते उडताना... आपणच वाईट , त्यांना पिंजऱ्यात पकडून ठेवतो. " सुप्रीही पाहत होती त्या थव्याकडे. आणि नजर गेली आकाशकडे. कसा हसतो आहे ना ... चालता चालता... तोही तर पक्षीच आहे ना .... स्वतंत्र... त्यालाही उडायचे असते नेहमीच ... बंधनात तर स्वार्थी लोकं अडकवतात त्याला. आपल्या सारखी माणसं .. सुप्रीच्या मनात विचार येऊन गेला.  

आणखी काही पावलं चालून त्यांनी थांबवायचा निर्णय घेतला. आकाशने सांगितल्याप्रमाणे , अर्ध्या लोकांनी जेवणाची तयारी सुरुवात केली, उरलेल्या लोकांनी साऱ्यांचे तंबू उभे करायचे काम हातात घेतले. सुप्रीही तंबू उभे करण्यात मदत करत होती. सरतेशेवटी आकाश सुप्रीचा तंबू उभा करण्यासाठी सुप्रीजवळ आला. थोडावेळ तर पाहतच राहिले दोघे एकमेकांना. जणू काही अनोळखी दोघे. आकाशने तंबूकडे नजर टाकली. दोघे मिळून काम करत होते. एकही शब्द न बोलता. काम झालं.
" कशी आहेस  थकली असशील ना ... आराम कर ... नंतर जेवायला ये ... " आकाशने सुप्रीला सांगितलं.
" तू नाही दमलास का ... " आकाश फक्त सुप्रीकडे पाहत होता. काहीच न बोलता आणखी कोणाला मदत हवी का ते बघायला पुढे गेला.

              दुपारी जेवण झाली सर्वांची आणि सर्व पाय मोकळे करायला आजूबाजूला भटकू लागले. अचानक अंधारून आले. पावसाची चिन्हे . आकाश अंदाज लावत होता पावसाचा. यांच्या कॅम्प पासून पुढे काही अंतरावर सुप्री बसलेली होती एकटीच. जुनी सवय तिची. काही झालं कि अशी एकटी जाऊन बसायची , सर्वापासून दूर . आकाशने पाहिलं तिला. तिच्या जवळ आला.
" सुप्री ... एकटी काय बसली आहेस .... पाऊस येतो आहे ... tent मध्ये जाऊन बस ... " ,
" एकटीच बसणार ना ... तुला कुठे वेळ आहे माझाशी बोलायला. या प्रवासाला निघताना सुद्धा बोललास ... पूजा सोबत रहा, आधी किती प्रवास एकत्र केले आपण तेव्हा तर कधी बोलला नाहीस असं .... तेव्हा तुझ्या सोबतच पाहिजे असायची मी... असा का वागतो आहेस ... " ,
" सुप्री ..... काहीच गैरसमज करून घेऊ नकोस ... मला फक्त हा प्रवास पूर्ण करू दे ... तुला बघितलं कि सारखं वाटते ... तू मला इथून दूर घेऊन जायला आली आहेस ... त्यासाठीच हे .... फक्त हा प्रवास .... मला जगू दे यात , नंतर कधीच नाही थांबवणार तुला ... तू जे सांगशील ते करिन .... पुन्हा सांगतो .... गैरसमज आणू नकोस या मध्ये कुठेच ... मी तोच आकाश आहे ... तू ज्याला ओळखतेस तो ... ",

" पण .... " सुप्री पुढे काही बोलणार होती . आणि एक थंड हवेचा झोत आकाशकडे झेपावला. सवयी प्रमाणे आकाश त्या दिशेने पुढे चालत गेला. प्रत्येक नात्यात काही त्रुटी असतात , नात्यांच्या भिंती कितीही सुंदर असल्या तरी काही भेगा असतात त्यात . आकाश खूप सांभाळून घेतो आपल्याला , आपणच त्या भेगा वाढवतो आहे का .... सुप्री त्याला दुरूनच पाहत होती. पुढे एका उंच ठिकाणी जाऊन पावसाचा अंदाज घेऊ लागला. 

पूजानेही सुप्रीला बघितलं होते. तीही सांगायला आली. " अगं एकटी का बसली आहेस ... वादळ येते आहे बघ. चल लवकर खाली .... " सुप्रीने पूजाकडे पाहिलं. " चल लवकर ... बाकीचे सर्व त्यांच्या तंबूत जाऊन बसले आहेत .... तुला बघितलं म्हणून इथे आली .. चल पट्कन ... वादळ येते आहे ... " सुप्री उभी राहिली. एकदा तिने वर आभाळात पाहिलं . शिवाय समोर असणाऱ्या डोंगररांगांकडे बघितलं. " वादळं काय फक्त आभाळात आणि समुद्रात येतं असतात का .... मनातल्या वादळांचे काय करायचे मग ... कोणी थोपवायची ती वादळं .... " सुप्रीने दूर उभ्या असलेल्या आकाशकडे नजर टाकली. तो तर त्या वातावरणात मग्न झालेला होता. सुप्रीने पुन्हा पूजाकडे पाहिलं.

वाऱ्यानेही आता जोर धरला होता. केस उडून उडून चेहऱ्यावर येतं होते. तरी सुप्रीच्या डोळ्यात काय सुरु आहे , पूजाला कळलं. सुप्री निघून गेली कॅम्पच्या दिशेने. पूजा तिथेच उभी राहून कधी पाठमोऱ्या सुप्रीकडे पाही तर कधी वादळाचा अंदाज लावणाऱ्या आकाशकडे. बरोबर दोघांच्या मध्ये उभी होती ती. तिचे हि लक्ष समोर गेले. समोर असलेल्या डोंगररांगा आता जवळपास दिशेनाश्या झाल्या होत्या. दिसत होते ते फक्त त्यांच्या आकाराचे मनोरे .... इतके काळे ढग चाल करून येत होते समोरून .. अधे - मध्ये विजांचा प्रकाश आणि त्यानंतर येणारा आवाज मनात कालवा करत होता. सोबत सोसाट्याचा वाराही येणार... खरच मोठे वादळ येते आहे .... पूजा अजूनही सुप्री - आकाश कडे पाहत होती. 

======================================     to be continued........................

2 comments:

  1. Hi Vinit,
    Mala kahi tumchya sarakha chan lihita yet nahi...pan tumhi je chan lihita te sarva vachate me agadi vel kadhun...asach sundar lihit ja ani amhala chan asa vachayala milude laukar...pudachya bhagachi khup aaturtene vaat pahatoy....hope tumhi laukarach post karal..

    ReplyDelete
  2. Sir paus suru jhalay.ami vat pahatoy tumchya next part chi

    ReplyDelete

Followers